23.1 C
New York

Heavy Rain : गरज असेल तरच बाहेर पडा मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

Published:

मुंबई

मुंबईत मुसळधार पावसाने (Heavy Rain) चांगलंच थैमान घातलं असून गेल्या ६ तासांत तब्बल ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुंबईतील रस्ते जलमय झालेत. सखल भागात पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. लोकल ट्रेनला देखील या पावसाचा मोठा फटका बसलाय. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेला आवश्यक असल्यास घराबाहेर पाडा असे आवाहन केले आहे

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मी दिले आहेत. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे असं आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईकरांना केलंय.

अजित पवार यांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबईतील पावसाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्वीट करत माहिती दिली आहे. “काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“हवामान बदलामुळे भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे”, असंही अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img