मुंबई
मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला जात आहे. मुंबईत मराठा माणसांना घरे मिळत नाहीत. त्यामुळे मुंबईत मराठी माणसांना 50 टक्के घरे राखीव असावे असं विधेयक येत आहे. 50 टक्के राखीव जागा मराठी माणसांना मिळाली पाहिजे, खासगी बिल्डरच्या घशात सर्व काही न घालता एसआरएच्या काही कंपन्यामार्फत व्यवस्थित टेंडर काढून घरे देण्याची जबाबदारी सरकारला घ्यायला हवी. यामध्ये मुंबईच्या मराठी माणसाला प्राधान्य द्यायला हवे. अशी मागणी अर्थसंकल्प सादर होण्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackera) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसासाठी हक्काचे घर हे असलेच पाहिजे. झपडपट्ट्यांमध्ये काही बहुमजली झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. अशामध्ये त्यांचीसुद्धा शहनिशा केली पाहिजे. त्यामध्ये पात्र अपात्र हा जो काही घोळ आहे, यावरही काही सरकारकडून व्यवस्थित तोडगा काढला जावा. अशी मागणीही त्यांनी केली आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. इतर डबे जोडले जात आहेत. येत्या २ त ३ महिन्यात महाराष्ट्रातील जनता त्यांना आरसा दाखवेल.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतकऱ्यांची वीज बिले देखील माफ करावीत. लाडकी बहीण योजना आणली तर आम्हाला आनंद आहे.लेकींची काळजी घेत आहेत पण लेकांची देखील काळजी करावी. लाडका पुत्र ही देखील योजना त्यांनी आणावी. आज अनेक तरुण बेरोजगार आहेत. तरुणांचे लोंढे आज नोकरीच्या शोधात फिरत आहेत. त्यामुळे त्यांचा देखील विचार करावा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.