21 C
New York

Nana Patole : दुष्काळाने पिचलेल्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफ करा – पटोले

Published:

मुंबई

राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली, याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थीती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ व राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. या शिष्टमंडळात प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री यशोमती ठाकूर, खा. शोभा बच्छाव, खा. वसंतराव चव्हाण, खा. बळवंत वानखेडे, आ. मोहन हंबर्डे, आ.वजाहत मिर्झा, आ. धीरज लिंगाडे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ. विरेंद्र जगताप, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, NSUI चे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, राजेश शर्मा, रमेश शेट्टी, रमेश कीर, प्रमोद मोरे, सचिव झिशान अहमद, अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिरुध्द ऊर्फ बब्लू देशमुख, अकोल्याचे प्रमोद डोंगरे, संदीप पांडे, आकाश जाधव, डॉ. गजानन देसाई, धनराज राठोड, मदन जाधव आदी उपस्थित होते.

राज्यपाल यांना भेटल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना सरकार सुट्टीवर गेले होते तर काही मंत्री परदेशात गेले होते. मंत्र्यांना परदेशात जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. या मंत्र्यांनी कोणाची परवानगी घेतली होती, ह्याचा खुलासा झाला पाहिजे. शेतकरी संकटात सापडलेल्या आहे, त्याला आधाराची गरज आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी ४ लाख रुपये द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु कराव्यात व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. राज्यात खतांचा काळाबाजार सुरु आहे. खरीपाच्या पेरणीसाठी खते आणि बियाणे सरकारने पुरवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संसद परिसरात असलेल्या या दैवतांचे पुतळे भाजपा सरकारने काढले आहेत, त्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला व मा. राष्ट्रपती महोदय यांना आमच्या भावना कळवा. आमच्या महापुरुषांचा अपमान सहन केला जाणार नाही असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

महामहिम राज्यपाल यांच्या भेटीदरम्यान पवईतील भीमनगर झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या नियमबाह्य कारवाईचा मुद्दाही मांडण्यात आला. हिरानंदानी या बिल्डरसाठी सरकारने गरिबांना बेघर केले आहे. सरकार, प्रशासन व बिल्डराच्या संगनमताने ही कारवाई करण्यात आली आहे. पावसाळ्यात अशी कारवाई करू नये असा नियम आहे, सर्वोच्च न्यायालयाचेही तसे निर्देश आहेत असे असतानाही कारवाई करण्यात आली असे नाना पटोले म्हणाले.

यासंदर्भात बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, भीमनगरमध्ये तीन पिढ्यांपासून रहात असलेल्या या लोकांवर ६ जून रोजी पोलीसांनी जबरदस्तीने घरात घुसून लोकांना मारहाण केली व बाहेर काढले, यात महिला, वरिष्ठ नागरिक, लहान मुले यांनाही मारहाण करण्यात आली. महानगरपालिकेचे अधिकारी व पवई पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी एका बिल्डरसाठी तीन पिढ्या रहात असलेल्या जवळपास ६५० कुटुंबांना बेघर केले. या सर्व कुटुंबाचे त्याच जागी पूनर्वसन करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच नियमबाह्य कारवाई केलेल्या मुजोर मनपा अधिकारी, पोलीस व बिल्डरवर एससी, एसटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत व त्यांना निलंबत करावे. या संपूर्ण घटनेची मा. उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश यांच्यामार्फत चौकशी करावी अशी मागणीही यावेळी राज्यपाल महोदय यांच्याकडे करण्यात आली.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्या…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषण सुरु केलेले आहे, राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी असे नांदेडचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांनी यावेळी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातील गैरकारभाराची SIT मार्फत चौकशी करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा आणि निकालामध्ये मोठ्या प्रमाणात अनिमियतता आणि गैरप्रकार झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. विद्यापीठाचे ईआरपी पोर्टल 4 महिन्यांपासून बंद आहे, विद्यार्थी या ग्रेड सिस्टममधील गुण ओळखू शकत नाहीत. १०० पेक्षा जास्त दिवस उलटूनही अंतिम वर्ष आणि पुरवणी परीक्षेचे निकाल पूर्णपणे जाहीर केलेले नाहीत. विद्यापीठाने ज्या पद्धतीने पेपर तपासणी प्रक्रिया केली आहे त्यातही गैरप्रकार झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img