18.8 C
New York

Vidhansabha : विधानसभेच्या जागेवरून नगरमध्ये युतीला तडे?

Published:

लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले. अहमदनगरमध्ये ( Ahmednagar ) देखील महायुतीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र लोकसभेननंतर आता विधानसभेची ( Vidhansabha ) तयारी सुरु झाली आहे. यातच लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांनी अहमदनगरमधून विधानसभा लढवावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहे. राज्यात महायुतीचे सरकार असताना विधानसभेपूर्वीच अहमदनगरमध्ये युतीला तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंडे यांच्या उमेदवारीसाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून वरिष्ठांना साकडे घालण्यात येत आहे मात्र राष्ट्रवादी ही जागा सोडणार का? तसेच त्यांची भूमिका काय असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

लोकसभेनंतर आता विधानसभेचे वेध उमेदवारांसह नेत्यांना लागले आहे. यातच यंदाची अहमदनगर शहराची विधानसभा निवडणूक देखील चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या स्थितीला विचार केला तर नगर शहराच्या या जागेवर अजित पवार गटाचे आ. संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत. परंतु आता शहर भाजप देखील या जागेची मागणी करत आतापासूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी समोर आली आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी ही मागणी केली आहे.

अजितदादांनी सांगितलं महायुतीच्या पराभवाचं कारण

आगरकर यांनी म्हंटले की, लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाने भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांनी आता खचता कामा नये. त्यांनी आता विधानसभा निवडणुकी तयारी केली पाहिजे. सध्या लोकसभेचा निकाल पाहता डॉ. सुजय विखे यांना नगर शहरातून मताधिक्य मिळाले असल्याने शहरात भारतीय जनता पार्टीसाठी पोषक वातावरण असल्याचे ते म्हणाले. आता यानंतर होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा चंग शहर भाजपने बांधला असल्याने पंकजा मुंडे यांच्यासारख्या सर्वमान्य चेहऱ्यास नगरमधून विधानसभा निवडणूकीचे तिकीट दिल्यास त्या निश्चितच विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vidhansabha राष्ट्रवादी जागा सोडणार का?

नगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. 2014 व 2019 या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीने या जागेवर विजय मिळवला आहे. मात्र राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गट व शरद पवार गट निर्माण झाला आहे. यामुळे अजित पवार गटाकडून जगताप हेच या जागेसाठी दावेदार असतील. मात्र आता शहर भाजपकडून मुंडे यांचे नाव समोर केले जात आहे. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने नगरची जागा कोणत्या पक्षासाठी सुटणार हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र पंकजा मुंडे यांना जर संधी मिळाली तर जगताप नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे देखील महत्वाचे असणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img