21 C
New York

Lok Sabha Result : भाजपची बालेकिल्ल्यातच पिछेहाट!

Published:

लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित इंडिया आघाडी विजयी होताना (Lok Sabha Result) दिसत आहे. केंद्रात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होईल. आता या सरकारला मोदी सरकार म्हणता येणार नाही कारण भाजपला बहुमत मिळालेले नाही त्यामुळे अन्य पक्षांच्या मदतीने सरकार चालवावे लागणार आहे. मागील दोन निवडणुकीत जो करिष्मा भाजपने करून दाखवला होता तशी कामगिरी यंदा करता आलेली नाही. विरोधी पक्ष अजूनही मजबूत आहेत हे इंडिया आघाडीने शानदार प्रदर्शन करत सिध्द केले आहे.

यावेळच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदर्शन मागील दहा वर्षांच्या काळातील सर्वात चांगले राहिले आहे. शंभर जागा जिंकण्याच्या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू आहे. देशातील सर्वात जुना पक्षाचा आत्मविश्वास यामुळे निश्चितच वाढला आहे. यावेळी अशा काही जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या तिथे काँग्रेसची कामगिरी मागील वेळी अतिशय खराब राहिली होती. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि अन्य काही राज्यांत काँग्रेसला अनपेक्षित विजय मिळाला आहे.

सगळ्यात आधी उत्तर प्रदेशचा आढावा घेऊ या राज्यात समाजवादी पार्टी आणि काँग्रेस दोघांनी मिळून अनेक जागांवर आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठीमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा विजयी झाले आहेत. अनेक वर्षानंतर सहारनपूर मतदारसंघात काँग्रेसला यश मिळालं आहे. येथे भाजपच्या राघव लखनपाल यांचा 64 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला आहे.

हनुमानानंतर भाजपवर रामही रुसला

बाराबंकी मतदारसंघात भाजपच्या राजरानी रावत पिछाडीवर पडल्या आहेत. यानंतर राजस्थान मध्ये सुद्धा काँग्रेसने जवळपास 10 जागांवर भाजपला धक्का दिला आहे. मागील वेळी या राज्यात काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. आता मात्र काँग्रेसने जोरदार वापसी केली आहे. भरतपूर मतदारसंघात काँग्रेसच्या संजना जाटव यांनी भारतीय जनता पार्टीच्या रामस्वरूप कोली यांचा पराभव केला आहे. सीकर मतदारसंघातही मोठा उलटफेर झाला आहे. येथे भाजपच्या सुमेधाचंद सरस्वती यांचा पराभव झाला आहे. 72 हजारांपेक्षा जास्त मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. झुंझुनु मतदारसंघातही काँग्रेसने भाजपाला धक्का दिला आहे. काँग्रेसच्या विजेंद्र सिंह ओला यांनी भाजपाच्या शुभकरण चौधरी यांचा पराभव केला. ओला यांनी 18235 मतांची आघाडी घेत विजय मिळवला.

हरियाणातील दोन हाय प्रोफाईल जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. हिसारमध्ये काँग्रेसच्या जयप्रकाश यांनी बीजेपीच्या रणजीत सिंह यांचा पराभव केला. दुसरीकडे सिरसा मतदारसंघात काँग्रेसच्या सेलजा कुमारी यांनी भाजपच्या अशोक तंवर यांचा 2.68 लाख मतांनी पराभव केला. अशा पद्धतीने भाजपला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत पक्षाचं नेमकं कुठं चुकलं. जागा कमी होण्यामागे काय कारणं होती याचा शोध घेण्यास भाजपनं सुरुवात केली आहे. आता या धक्क्यातून भाजप स्वतःला कशा पद्धतीने सावरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img