21 C
New York

Mahadev Jankar : जरांगेंच्या आंदोलनाचा फटका बसला- जानकर

Published:

परभणी

विकासाच्या माध्यमातून काम करतो. सब समान तो देश महान असा माझा अजेंडा आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. पक्षाचा एक विद्यमान आमदार ओबीसी (OBC) समाजातील आहे. तसेच काही ठिकाणी मुस्लीम समाजाचे नगरसवेक आहेत. सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा माझा अजेंडा आहे. सर्व समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. मात्र, काही प्रमाणात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाचा मला फटका बसला, असे मोठे विधान महायुतीचे उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केले.

परभणीच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मला लवकर स्वीकारले. विकासाच्या मुद्यांवर येथील जनतेने प्रेम दिले. सर्व समाजातील लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. आता ४ जून रोजी विजयाचा गुलाल हा माझा असेल असा विश्वास वाटतो, असे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच महायुतीला ४२ जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला सहा जागा मिळतील. देशात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. परभणीचा खासदार म्हणून शपथ घेईन, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

परभणीची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास 55 ठिकाणी सभा घेतल्या. सभांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वेळ दिला. मतदान संपल्यावर माझ्या मतदारसंघात येऊन पाण्याच्या प्रश्नांसह अनेक अन्य प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. आचारसंहिता संपल्यानंतर परभणीच्या कामांचे प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करेन, असे जानकर यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे महादेव जानकर आणि महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव निवडणूक रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. आता आणखी दोन टप्प्यातील मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान झालेले आहे. ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img