23.1 C
New York

Ramesh Chennithala : नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, काँग्रेसचा हल्लाबोल

Published:

मुंबई

देशाच्या प्रगतीत शेतकरी व कामगारांचा मोठा वाटा आहे, कामगार शक्तीच्या जोरावरच देशाने प्रगती केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारने कामगार हिताचे कायदे केले, कामगारांना संरक्षण दिले, कामगारांचे हित जपले परंतु मागील 10 वर्षातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकाने मात्र कामगार हिताचे कायदे बदलून उद्योगपती धार्जिणे कायदे बनवले व कामगारांना देशोधडीला लावले, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी केला.

प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचा (इंटक) मेळावा पार पडला, या मेळाव्यात ते बोलत होते. कामगारांना संबोधित करताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारच्या काळात लाखो कामगार देशोधडीला लागले, छोटे, मध्यम उद्योग बंद पडले. मोदी सरकारला कामगारांची चिंता नाही त्यांना चिंता आहे ती फक्त मुठभर उद्योगपतींची. महागाईचा सर्वात जास्त परिणाम कामगारांवर होतो. 10 वर्षात महागाई गगनाला भिडली पण मोदी सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. मोदी सरकार शेतकरी, कामागार व गरिबांचे नाही तर मालकधार्जिणे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत आहेत. मोदी खोट्यांचे सरकार आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहिरनामाबद्दल अपप्रचार करत आहेत. 15 टक्के बजेट मुस्लीमांसाठी ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता असा खोटा आरोप मोदींनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होत असल्याने नरेंद्र मोदी भ्रमनिराश झालेले आहेत या निराशेतून ते काहीही बोलत आहेत. लोकसभा निवडणुक ही अत्यंत महत्वाची असून कामगारांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही रमेश चेन्नीथला यांनी केले.

या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, शिवसेना नेते व आमदार सचिन अहिर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, इंटकचे प्रदेशाध्यक्ष कैलास कदम, गोविंदराव मोहिते, दिवाकर दळवी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या समन्वयक प्रगती अहिर व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img