21 C
New York

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जून खर्गेंचा मोदींवर हल्लाबोल

Published:

धुळे

काँग्रेस (Congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले व देशाला स्वातंत्र मिळवून दिले, भारतीय जनता पक्षाने (BJP) देशासाठी काय केले असा प्रश्न विचारत निवडणुकीत विकासाच्या कामावर मते मागितली पाहिजेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दररोज हिंदू-मुस्लीम समाजात तेढ निर्माण करणारी विधाने करत आहेत. उठसूट मुघल, मुस्लीम व मंगळसूत्र हीच भाषा वापरतात आणि अब की बार 400 पार चा नारा देतात. देशातील चित्र बदलले आहे अब की 400 पार नव्हे तर भाजपाला देशभरातून 40 जागाही मिळणे अवघड आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केला आहे.

इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी धुळे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत खर्गे बोलत होते. भाजपा व मोदी सरकारचा समाचार घेत ते पुढे म्हणाले की, भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदी यांना ४०० जागांचे बहुमत मिळवून संविधान संपवायचे आहे. २०१५ मध्येच संविधान बदलण्याची जाहीर भाषा करण्यात आली होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आरक्षणाची समिक्षा करण्याचे जाहीरपणे सांगितले आहे, आताही भाजपा खासदार संविधान बदलणार असल्याचे बोलत आहेत. संविधान बदलले तर दलित, मागास, गोरगरिब लोकांचे आरक्षण व मुलभूत हक्क हिरावून घेतल जाणार आहेत. संविधानाचे रक्षण केले नाही तर जनतेचे नुकसान होणार आहे. भाजपाचा हा डाव कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर भाजपाचा पराभव करून इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आणा असे आवाहन खर्गे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज खोटे बोलतात, खोटे बोलण्याची त्यांना सवय झाली आहे. परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देणार, दरवर्षी २ कोटी नोकरी देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, असे सांगितले होते पण यातील एकही आश्वासन मोदींनी पूर्ण केले नाही. आता ते मोदी गॅरंटी म्हणत आहेत पण जनता आता नरेंद्र मोदींच्या अशा भूलथापांना बळी पडणार नाही. मोदी सरकारने विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास दिला. दडपशाही करून ८०० लोकांना ईडी, सीबीआयचा गैरवापर करून जेलमध्ये टाकले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अजित पवार व एकनाथ शिंदे यांनीही कारवाईच्या भितीपोटी नरेंद्र मोदी समोर लोटांगण घातले. मोदी सरकार निवडून आलेले सरकार पाडण्यासाठीही ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या तीन चाव्यांचा वापर करते असा आरोपही खर्गे यांनी केला.

या सभेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, आमदार वजाहत मिर्जा, माजी मंत्री अनिस अहमद, धुळे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष श्याम सनेर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img