23.1 C
New York

Rahul Gandhi : राहुल आणि प्रियांका अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनाला जाणार

Published:


नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) उत्तर प्रदेशातील आपला पारंपरिक मतदार संघ अमेठीतून तर आणि प्रियांका गांधी वढेरा (Priyanka Gandhi) रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी काँग्रेसचे हे दोन्ही नेते अयोध्येत राम मंदिरात जाऊन राम लल्लाचे (Ram Lalla) आशीर्वाद घेणार आहेत. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड (Waynad) मतदारसंघातून लोकसभेसाठी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे.वायनाडमध्ये शुक्रवारी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. राहुल गांधी अमेठीतूनही अर्ज दाखल करणार आहेत. सन 2019 मध्ये येथून निवडणूक हरले होते.
अमेठीतून राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास त्यांचा तिसऱ्यांदा भाजपच्या स्मृती इराणी यांच्याशी सामना होणार आहे. 2014 मध्ये राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांचा पराभव केला होता, तर 2019 मध्ये त्या राहुल गांधी यांचा पराभव करून जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांनी रायबरेलीमधून उमेदवारी अर्ज भरल्यास ही त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक असेल. सोनिया गांधी या रायबरेलीच्या विद्यमान खासदार आहेत, मात्र त्या आधीच राज्यसभेवर गेल्या आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही काँग्रेसचे गड राहिले. स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा 55,120 मतांनी पराभव केल्यानंतर काँग्रेसचा हा गढ ढासळला. यावेळी रायबरेलीची निवडणूक काँग्रेसच्या कोणत्याही उमेदवारासाठी आव्हानात्मक असेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 2019 मध्ये रायबरेलीमध्ये सोनिया गांधी यांनी भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांचा १,६७,१७८ मतांनी पराभव केला होता.
काँग्रेसने अमेठीविषयी व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली आहे. 26 एप्रिलला वायनाडमध्ये मतदान संपल्यानंतर अमेठीतील काही नेत्यांना 27 आणि 28 एप्रिलला दिल्लीत बोलावण्यात आले आहे. राहुल गांधी आणि त्यांची टीम काँग्रेसच्या अमेठी मतदार संघातील प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत राहुल गांधी अमेठीतून आणि प्रियंका गांधी वढेरा रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. राहुल आणि प्रियंका यांच्या अयोध्या दौऱ्यावरही काँग्रेस नेते चर्चा करणार आहेत, मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 20 मे रोजी अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img